नुकतीच भारताच्या सायना नेहवालने सुपर सिरीज मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या या कामगिरीमुळे समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे...
नुकत्याच झालेल्या इंडोनेशिया ओपन ब्याडमिटन स्पर्धेत चीनच्या लीन वांगला पराभूत करीत भारताच्या सायना नेहवालने सुपर सिरीज मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या या कामगिरीमुळे समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. याचे कारण म्हणजे आतापर्यंतच्या कोणत्याही भारतीय ब्याडमिटनपटूपेक्षा सायनाची कामगिरी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली आहे. हि कामगिरी करून सुपर सिरीज ब्याडमिटन स्पर्धा जिंकणारी पहिला महिला खेळाडू होण्याचा मान तिने पटकावला आहे.
भारतीय ब्याडमिटनपटू प्रकाश पदुकोन आणि पुलेला गोपीचंद यांनी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड ब्याडमिटन स्पर्धेचे जेतेपद पटकावून अशीच ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यांच्या या विजयामुळे ब्याडमिटन खेळला भारतात मनाचे स्थान प्राप्त झाले. सायनाने आपल्या कामगिरीने प्रकाश पदुकोन अन तिचे सध्याचे प्रशिक्षक असलेलेल्या पुलेला गोपीचंद यांच्याशी बरोबरी साधण्याची किमया केली आहे. 'फादर्स डे' निमित्त तिने हि आपल्या वडिलांना सुंदर भेट दिली.
हा विजय भारतीय ब्याडमिटनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा ठरला. कारण जागतिक मानांकनात ८ व्या स्थानावर असलेल्या सायनाने ३ ऱ्या स्थानी असलेल्या चीनच्या लीन वांगला पराभूत केले. जागतिक क्रमवारीत आपल्यापेक्षा सरस असलेल्या खेळाडूला पराभूत करीत विजेतेपद मिळविणे म्हणजे भारतीय ब्याडमिटन मधला सोनेरी क्षणच होता.
सायनाच्या या कामगिरीमुळे ब्याडमिटन खेळातल्या चीनच्या वर्चस्वालाच हादरा बसला आहे. कारण या सामन्यात आपल्या प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणण्याची एकही संधी तिने सोडली नाही. तिच्या आक्रमक आणि प्रसंगावधान राखून खेळण्यामुळे तिने अआप्न ब्याडमिटन मधील सर्वोत्तम महिला खेळाडू बनण्यास लायक असल्याची चुणूक दाखवून दिली आहे. खरोखरच भारतीय ब्याडमिटन साठी हा खूप मोठा क्षण आहे. तिच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही तिचे कौतुक केले. सायनाने समस्त भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली असल्याचे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
सायनाची कामगिरी गौरवास्पद नक्कीच असली तरी याच्यामागे असलेल्या तिच्या अथक परीश्रमांचाही याठिकाणी उल्लेख होणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात यशासाठी शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आजच्या तरूणाईने सायनाचा आदर्श समोर ठेवायला हवा. सायनाचे हे यश सहज मिळालेले यश नाही. त्याच्यामागे तिच्या कठीण परिश्रमांची साथ आहे.
हरियाणातल्या हिस्सार येथे डॉक्टर हरविरसिंग अन उषा नेहवाल यांच्या पोटी सायनाचा जन्म झाला. आई- वडील दोघेही ब्याडमिटनपटू असल्याने या खेळाचे बाळकडू तिला लहानपणीच मिळाले. सध्या हैदराबादच्या तेलबिया संशोधन संस्थेत संचालक असलेल्या तिच्या वडिलांनी तिला वयाच्या ८ व्या वर्षीच नानीप्रसाद यांच्या शिबिरात दाखल केले. इथपासूनच तिच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. घरापासून २० किलोमीटर अंतरावर लालबहाद्दूर स्टेडीयम ती २ तास सराव करायची. न नंतर शाळेत जायची. आज तिच्या वयाची मुले मस्तीत रममाण झालेली दिसतात. सायना मात्र या वयात उकडलेल्या भाज्या अन फलाहार घेऊन जिममध्ये घाम गाळताना दिसते. तंदुरुस्त राहावे म्हणून आईसक्रीम, तळलेले पदार्थ यांची तिने आपल्या आहारातून हकालपट्टी केली. चित्रपट पाहणे म्हणजे निव्वळ ३ तास वाया घालविणे असे तिला वाटते. अवघ्या १९ वर्षे वयातच ती डायेट करते आहे.
ब्याडमिटनच्या क्षेत्रात दादागिरी करणाऱ्या चीन अन कोरियाच्या खेळाडूंना टक्कर द्यायची असेल तर हि शिस्त असायलाच हवी असे तिला वाटते. हे सगळ कशासाठी तर एकच लक्ष्य...भारताला पदकांची कमाई करून देणे.! खेळासाठी तिने आपल्या आयुष्यातल्या अनेक मोहांवर पाणी सोडले. खरच निष्ठा असावी तर अशी.!
अजूनही ती सकाळी ६ वाजता उठते. गोपीचंदच्या अकादमीत सराव करते. त्यामुळे तिच्यात चपळपणा आला आहे. रविवार मात्र तिच्यासाठी पूर्ण विश्रांतीचा दिवस असतो. आणि ९ तास झोप म्हणजे झोप. उगाचच आपल्या यशाचा बडेजाव नाही कि आई-बाबांकडे कसला हट्ट नाही. सायनाचे प्रशिक्षक गोपीचंद तर तिच्या आत्मविश्वासावर प्रचंड फिदा आहेत. ४-साडेचार तास ती त्यांच्याशी चर्चा करते पण तिला जास्त सांगण्याची आवश्यकता भासत नाही, असे ते म्हणतात. मेहनतीसाठी तर ती कधीच मागे-पुढे पाहत नाही.
सायनाच्या आक्रमक खेळाचा तिला चांगलाच फायदा झालेला आहे, त्यामुळे चुका होण्याचा धोका अधिक असला तरी खेळताना तुमचे भान आणि जोश यांचे संतुलन साधले, तर बिनचूकपणे खेळता येते. सायना तर प्रतिस्पर्ध्याचे गुण अन चुका हेरण्यात अतिशय पटाईत आहे. त्यामुळेच कोर्टवर उतरल्यानंतर जिंकण्यासाठी ती जीवाचे रान करते. तिच्या विजयात सातत्य नसले तरी यशाने हुरळून जाणारयातली ती नक्कीच नाही. आपणही तिच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवणे गैर नसले तरी थोडा वेळ तिला द्यायलाच हवा. आता कुठे १९ वर्षांचे वय आहे. एक मात्र नक्की आहे. तिचे भविष्य उज्वल आहे. कारण "सायना इज रियली शायनिंग..!"
1 टिप्पण्या
वा वा महेश चांगला ब्लॉग लिहितोस. बरे झाले आणखी एक साथीदार मिळाला. आपण नगर मध्ये ब्लॉग लिहिणारे व नेत वापरणारे यांचा एक मेळावा घेत आहोत. पुणे मुंबई मध्ये असे खूप उपक्रम झाले आहेत. आता आपल्याया नगर मध्ये सुरु करायचे आहे. आपण याही बाबतीत मागे नाहीत हे दाखवून देऊयात. असेच लिहत जा. आपले रोजचे जगणे व काम वेगळे आहे. तुझ्या भाषेत ती आपली वेगळी भूमिका आहे. पण आपली ही कला आणि धडपड ही आपण जोपासालेई पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू. सगळे मिळून नगर साठी काही वेगळे करूया. यासाठीच आपल्याला मेळावा घायचा आहे.
उत्तर द्याहटवाविजयसिंह होलम